सोलापूर : यंदा राज्यातील विविध भागात झालेल्या गारपीट व वादळामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेला केशर आंबा यंदा जास्तच भाव खाव खात आहे. सोलापूर व पंढरपुरच्या बाजारपेठेत जंबो केशर पाचशे ते सहाशे रुपये डझन, तर नेहमीचा केशर आंबा तीनशे ते चारशे रूपये डझन विकला गेला आहे.
राज्याच्या विविध भागात नुकतीच गारपीट झाली होती. त्यातच वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे ऐन हंगामातच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये रायवळसह सर्वच प्रकारच्या आंब्याची गळ झाली. आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाल्यामुळे यंदा आंब्याचे २५ टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे. रत्नागिरी व देवगड हापूस आंबा खाणे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्रामीण भागातील विशेषतः मध्यमवर्गीय ग्राहकांना केशर आंब्याचाच दिलासा होता. आता गारपीट व वादळामुळे केशर आंब्याचेही नुकसान झाल्यामुळे केशर आंबा यंदा कमालीचा महाग झाला आहे.
या आठवड्यात केशर आंबा बाजारपेठेत दाखल झाला आहे; मात्र आंब्याची आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या वेळी अधिक महिना आल्याने या महिन्यात जावयाला सासूने वाण घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्यात आंब्याच्या वाणाचाही समावेश आहे. अधिक महिन्यातील वाणाची प्रथा व त्यानंतरचा दशहरा यामुळे आंब्याला यावर्षी मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे साहजिकच केशर आंब्याचे भावही वाढले असल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले.
‘यंदा वादळामुळे आमच्या आंब्याचे सत्तर टक्के नुकसान झाले आहे. वादळातून राहिलेला आंबा आता तयार झाला आहे. आंबा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने यंदा आंब्याचे दर वाढलेत; मात्र आमच्याकडे जास्त माल नाही,’ असे आंबा उत्पादक भारत रानरूई यांनी सांगितले, तर यंदा आंब्याचे दर वाढले असले, तरी ते नुकसान भरून निघणार नसल्याचे सचिन कुलकर्णी या शेतकऱ्याने सांगितले.